डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौध्द सोडून इतर दलितांनी स्वीकारले आहे का..??

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौध्द सोडून इतर दलितांनी स्वीकारले आहे का..??





डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आघाडयांवरून संघर्ष केला. प्रचंड लिखाण केले. वारंवार भारतात आलेल्या कमिशनना निवेदने सादर केली. अस्पृश्यांना अन्यायाच्या विरोधी लढा देण्यासाठी तयार केले. साऊथबरो कमिटी, सायमन कमिशन, गोलमेज परिषदांना त्यांनी सादर केलेली निवेदने जर बघितली तर अस्पृश्यांच्या सबळीकरणासाठी व विकासासाठी त्यांची बांधीलकी व तळमळ लक्षात येते. अस्पृश्यांना व डिप्रेसड वर्गाना गुलामीच्या व लाचारीच्या गर्तेतून बाहेर काढून अन्यायाविरुध्द लढाईस तयार करणे हे त्यांच्या लढयाचे मुख्य उद्दिष्ट होते. सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय सबळीकरण व विकास या तीन बाबी मागासलेल्या समुहांना मिळाल्या पाहीजेत यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले.


 


अनु.जाती, जमाती, गरीब,अल्पसंख्यांक व महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी बाबासाहेबांनी १९१९ ते १९५४ दरम्यान वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन जातीच्या आधारावरून होत असलेल्या भेदभावावर तोडगा काढण्यात यावा असे सुचविले. मे १९२८ ला सायमन कमिशनला दोन निवेदने दिली. गोलमेज परिषदेत दोन १९३०-१९३२ अस्पृश्यांच्या मागण्यासंबंधी अभ्यासपूर्ण निवेदने दिली. १९४० च्या दरम्यान आजच्या आरक्षण धोरणाचा आधार डॉ. आंबेडकरांनी तयार केला व भारत स्वतंत्र झाल्यानंतर आरक्षण धोरणाला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. बाबासाहेबांनी भारत देशाची जलनीती ( water policy ) नौकानयन विकासाचे सर्वसमावेशक प्रारुप ( inclusive development model ) मांडले व ते राबविले. भारताच्या लोकसंख्या धोरणविषयीचे विचार १९३७ ला मांडले व वाढत्या लोकसंख्येची समस्या हाताळण्यासाठी उपाय योजना सूचविल्या. ते देशाच्या सर्वसमावेशक विकासाचे शिल्पकार होते. अशी 'व्हिजन'आणि 'सर्वस्पर्शी परिप्रेक्ष्य' असतानाही त्यांना देशातील सर्व जनतेने स्विकारले का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

 



भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे एवं पिछडे वर्गोंके मसीहा याच विचाराने लोक त्यांना संबोधतात. महाराष्ट्रात ५९ अनु जाती आहेत. त्यातील ५ प्रमुख जाती म्हणजे महार (नवबौध्द) मातंग, चांभार, ढोर आणि होलर या आहेत. बौध्द वगळता इतर चार जातीनी बाबासाहेबांना सामुदायीक पातळीवरुन मान्य केले का? याचे उत्तर दुदैवाने नकारार्थी आहे. पण त्याची कारणे आपण समजून घ्यायला हवीत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची मंडळी तीन विशिष्ट प्रकारे आठवण काढतात. १) सरकारी-दरबारी त्यांची आठवण निघते. भारतीय घटनेचे ते शिल्पकार होते. दलितांचे कैवारी व उध्दारकर्ते होते अशी बोळवण केली जाते. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार भारतीय समाजाची पुनर्बाधणी करण्यासाठीचे त्यांचे योगदान याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते. त्यांना victim of reductionism केले जाते. हे दलितेत्तर मंडळीकडून होते हे वेगळे सांगायला नको. बाबासाहेबंची जयंती साजरी करणे म्हणजे एक ritual चा भाग झाला आहे. २) डावे-उजवे, भगवे या राजकीय पक्षांना बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची ' Allergy ' झाली आहे. डावे पक्ष बाबासाहेबांना Caste leader म्हणूनच संबोधतात. उजव्या पक्षांनी डॉ. आंबेडकरांना हिंदुत्वाच्या माहोलमध्ये Co-opt करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाचे राजकारण केलं गेलं. राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या विचारांची थट्टा केली गेली. ३) तिस-या प्रकारात बाबासाहेबांची आठवण काढणारी दलित मंडळी आहेत. बाबासाहेबांना ते ' Symbol of revolt ' म्हणूनच स्वीकारतात. देशपातळीवर दलित जनतेनी त्यांना स्विकारले आहे. ही जनता आंबेडकरांच्या योगदानाचा, सिध्दांताचा व विचारांचा वापर करतात. त्यांच्या छोटया मोठया प्रश्नांची तड लावण्यासाठी आंबेडकरी प्रेरणा हीच त्यांची शक्ती आहे. खऱ्या अर्थाने ही सामान्य जनता बाबासाहेबांची अनुयाची आहे. बाकीच्या अनुयायांविषयी न बोललेलच बरं! 






 

महाराष्ट्रातील बौध्देत्तर दलितांनी बाबासाहेबांची विचारप्रणाली व नेतृत्त्व स्विकारले का? याचे उत्तर 'हो' आणि 'नाही' असेच आहे. डॉ. आंबेडकरांना का स्विकारले नाही? या उत्तरासाठी आपल्याला मातंग, ढोर, चांभार व होलर या प्रमुख जातींचे जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये 'स्थान' काय होते हे बघावे लागेल. वरील चार जातींना गावगाडयात पारंपारिक व्यवसाय होता. पारंपारिक कला कुसर हाती असल्याने आर्थिक आधार त्यांना होता. म्हणून 'जात आणि व्यवसाय' यांच्यात सातत्य राहिले. त्यामुळे त्यांचे स्थलांतर mass based वर झाले नाही. या जातींनी 'सांस्कृतिकरणाची' प्रक्रिया अवलंबवीली. या उलट नवबौध्दांनी बाबासाहेबांच्या लढयाला व नेतृत्वाला विद्युतगतीने सामुदायीक व समुच्चयाने प्रतिसाद दिला. दर्जा वाढविण्यासाठी सांस्कृतीकरणाच्या प्रक्रिये ऐवजी political means वापरले. परिणामी, त्यांच्या सामाजिक गतीशिलतेसाठी, इतर घटकांव्यतिरिक्त, डॉ. बाबासाहोंचा role महत्वाचा घटक राहीला आहे. यावर खूप संशोधन झाले आहे. वरील प्रकारच्या तपशीलात गेल्यास तीन प्रकारच्या images निर्माण झाल्याचे लक्षात येते.महार/नवबौध्दांनी अंगीकारलेली Aggressive strategy ,ढोर-चांभारांची imitative strategy आणि मातंगाची depressive revivalist strategy. बौध्द समुदाय प्रत्येक front वर आक्रमक Aggressive राहिला म्हणून सामाजिक गतीशिलता जास्त प्रमाणात आली.चांभार-मातंग समुदायात सामाजिक गतीशिलता हिंदू समाज व्यवस्थेच्या मुल्य व्यवस्थेच्या आधीन राहूनच आली.




 

बौध्दांनी डॉ.आंबेडकरांकडे Role Model म्हणूनच बघितले. 'शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा' या घोषणेला भरभरून प्रतिसाद दिला.अनेक संघर्षात त्यानी खूप किमंतही मोजली.पण अन्यायाविरूध्द समुच्चयाने लढण्याची ताकद त्याच्यात निर्माण झाली.आपण अन्यायाविरूध्द लढू शकतो ही मनाची तयारी झाली. हे केवळ आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. ज्या मंडळींनी सामुहीक व समुच्चयाने डॉ.आंबेडकरांना स्वीकारले त्यांनी आंबेडकरीचे आज किती वाटे पाडलेत? तरी ते स्वतःला आपण बिनीचे आंबेडकरवादी आहोत असे समजतात ना? बौध्देत्तर दलितांच्या आंबेडकरी निष्ठा पदोपदी तपासण्यासाठी ते परीक्षकाची भूमिका घेतात. हा असा अधिकार त्यांना कसा काय प्राप्त होतो? हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. दुदैव हे आहे की, ना सवर्णानी ना दलित अनुयायांनी बाबासाहेबांना digest केलं. digest केलं नाही तर कृतीकार्यक्रम व्यवहारात कसा आणणार? फक्त ritual म्हणून किंवा भावनात्मक पातळीवर बाबासाहेब स्विकारण्याचे दिवस केव्हाचे संपले आहेत, हे लोकांना का कळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. 


जय भीम.





लेखं- निलेश ठेगे.



No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...