कठीण वाटणारी कसरत महापुरुषांनी करून दाखवली म्हणून ते 'महापुरुष' ठरले !!

कठीण वाटणारी कसरत महापुरुषांनी करून दाखवली म्हणून ते 'महापुरुष' ठरले !!


मी बऱ्याचदा ऐकतो- "आम्ही एवढे चांगले सांगतो, त्यांच्याच भल्यासाठी, प्रगतीसाठी सांगतो तरी लोक आमचं ऐकत नाहीत तेव्हा प्रचंड राग येतो.."

 



असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे आपण एखाद्याच्या भल्यासाठी सांगायला जावं आणि त्याने त्याकडे सरळ सरळ कानाडोळा करावा म्हणजे राग हा येणारच ना राव..!! पण या सगळ्यात आपण राग हा त्या लोकांवरच काढतो. यात आपली अशी काहीच चूक नाही असं आपल्याला वाटतं. पण हे पूर्णसत्य नाही. चूक आपलीच असते..मी तर म्हणेन कि जास्त चूक हि आपल्याच बाजूने असते.

 



आपण जेव्हा कोणतीही गोष्ट समाजात 'नियम' म्हणून घेऊन जातो, तेव्हा लोक ते स्वीकारण्याच्या दृष्टीने उदासीन असलेले आपल्याला दिसतात. हा मानवी स्वभावच आहे. कारण मानवाला कोणताही 'नियम' नकोच असतो. त्याला स्वतंत्र रहायला आवडते. मग म्हणून आपण सांगणेच सोडावे का..??

 



तर नाही...!! 'एखादी गोष्ट मला योग्य वाटते किंवा अमुक एखाद्या महापुरुषाने सांगितली आहे म्हणून तुम्हाला आता ती करावीच लागेल' असा विचार करणे म्हणजे अपोक्तपणाचे लक्षण आहे. कारण आपण जेव्हा असे करतो तेव्हा तिला एक पाळावयाचा 'नियम' म्हणून घेऊन लोकांसमोर जात असतो. आणि 'नियम हे तोडण्यासाठीच असतात' या सूत्राप्रमाणे माणसाचा कल पळवाटा शोधून ते तोडण्याकडेच अधिक असतो. यावर उपाय काय..?? यावर उपाय त्याच महापुरुषांनी सांगितलेला आहे. तो म्हणजे जोवर कोणतीही गोष्ट माणसाच्या 'तत्वात' बसत नाही तोवर तो तीस गंभीरपणे घेत नाही, त्यावर अंमल करत नाही.

 



एक छोटंसं उदाहरण देतो. समजा तुम्ही एखाद्या मस्त पार्टीला गेला आहात. तिथे छानपैकी नटून-थटून तरुण मुलं-मुली आली आहेत. नुकतंच तारुण्यात आलेलं किंवा तारुण्याच्या मध्यावर येउन सागरी लाटांप्रमाणे उसळणारे मन पार्टीत आलेल्या तरुण तरुणींना शोधत असते. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची फिगर, त्यांचे सौंदर्य आपल्याला भुलवू लागते. त्यातील एखादी वा एखादा आपला पार्टनर असावा पासून ते अगदी शृंगारिक, वासनिक भावनेने सुद्धा आपण त्याकडे आपल्याही नकळत पाहू लागतो, हे कुणीही तरुण नाकारणार नाही. पण त्याच तरुण किंवा तरुणीच्या जागी जर आपली बहिण-भाऊ, मावशी, काकू, भाचा-भाची इ. असतील तर वरील भावना आपल्या मनात येतील काय..?? तर याचे उत्तर 'नाही' असेच देण्यात येईल. मग याचे कारण काय असावे..?? तर याचे कारण हेच कि, आपल्या संस्कारांत किंवा आपल्या जडण-घडणीत आपल्यात खोलवर रुजलेली 'तत्व' आपल्याला तसे करण्यापासून रोखत असतात.

 



मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश हाच कि, तुम्ही जे सांगताय ते जरी कितीही योग्य आणि जनकल्याणाचे असेल तरी लोक ते स्वीकारतील असेच नाही, त्यासाठी त्यांचे त्यांच्या 'तत्वांत' रुपांतर करावे लागेल. आणि हि कठीण वाटणारी कसरत महापुरुषांनी करून दाखवली म्हणून ते 'महापुरुष' ठरले.

 



म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- " मी 'नियम' (rules ) आणि 'तत्व' (Principles ) यांच्यात फरक करतो.."

 



आणि बुद्ध म्हणतात- "केवळ मी सांगतो किंवा धर्मग्रंथ सांगतात म्हणून एखादी गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका. ती तुमच्या बुद्धी पटलावर घासून पहा, त्यानंतरही जर ती तुम्हाला पटत असेल तर तिचा स्वीकार करा.."

 



दोन्ही महापुरुष तेच तर सांगतात. कारण नियम तोडणे सोपे असते, पण 'तत्वांशी' तडजोड म्हणजे 'स्व'त्वाशी तडजोड असते जी माणसासाठी फार कठीण सिद्ध होऊ शकते.

 

लेखं- गौरव गायकवाड.


1 comment:

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...