आजची स्त्री !!

गौतम बुद्धांनी स्त्रीमुक्तीचे पहिले क्रांतिकारक पाऊल उचलले. तिच्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून ‘एक मानव’ म्हणून बघितले. एकोणिसाव्या शतकात ‘क्रांतिबा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांनी स्त्रीमुक्तीसाठी आशेचा किरण दाखविला आणि पुढे 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' या मनूच्या वाचनाला हिंदू कोड बिलात मूठमाती देणारे ,महामानव विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांनी समाजव्यवस्थेत स्त्रियांना समानतेने वागविले जात नाही. म्हणून त्यांना कायदेशीर हक्क व अधिकार मिळावे, यासाठी घटनेच्या तिसर्‍या भागातील मूलभूत अधिकारातील कलम क्र. १४, १५, १६ मार्फत त्यांना समानतेचे अधिकार दिले.
आजची स्त्री हि शिक्षणाच्या प्रभावाने धीट झाली , चार भिंती ओलांडून घराबाहेर पडली. विकासाची नवनवी स्त्री मिळवती झाली, अधिक स्वतंत्र झाली , आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी झाली .'स्त्री' या शब्दांत असणारी शक्ती, निर्भिडता, आत्मविश्वास तिच्यांत आला, स्त्री शिक्षीत झाली तरच ती अन्यायाविरूध्द लढू शकते. शिक्षणामुळे आचार-विचारात प्रचंड परिवर्तन घडून येते विचारांमध्ये क्राती येते अस म्हंटल जात पण,जर आजची शिकलेली , सुदृढ, सक्षम आईच आपल्या मुलींना अंतरिक्षामध्ये कल्पना चावलासारखी झेप घ्यायला शिकविण्याऐवजी वडाला फेरा माराचला शिकवत असेल तर काय म्हणावे ?
उत्तर स्त्रियांचा आता पर्यतचा प्रवासात तिने नेमके काय मिळवले? आणि काय गमावले , काय बदल झालेत किवा काय बदल व्हयला हवेत याचा खालील मुद्द्यांवर खुल्या मनाने चर्चा करुयात स्वयं परीक्षण करुयात.
सासु आणि सुन यांच्या नात्यात आता तरी बदल हवेत का?
"सासू-सून" या नात्याला सुरवातीपासूनच थोडी काळी किनार आहे, पूर्वीपासूनच हे नात दुषित झाले आहे. म्हणूनच 'चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे', ही म्हण प्रचलीत होतीच .एक टक्का अपवाद वगळता ९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही आणि सून हि कधीच सासूची मुलगी होऊ शकत नाही.सासू आणि सुनेचे नाते हे तर आई आणि मुली सारखे असायला हवे पण असे होणे म्हणजे दिवसा स्वप्नाच म्हणावे लागेल ना? आणि त्यात दुर्देवाची गोष्ट म्हणजे सासू-सून या वादाचा फायदा घेवून आज शेकडोंच्या संख्येने सासू-सून मालिका तयार होताहेत आणि त्या पाहिल्या जात आहेत. हे नक्कीच धोकेदायक आहे.त्यामुळे नकारार्थी विचार मनात येऊन नकारार्थी प्रेरणा मिळून तसा परिणाम होतो. खरतर सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव , पण कुणाच ठाऊक हे दोन जीव एकमेकांना इतक्या दुराव्याने का पाहातात ते .शेवटी दोघींना एकाच घरात राहायचे असते. शिवाय हे नाते तुटणारेही नसतेच ना मग उगाच गैरसमजाचे डोंगर उभारून, नात्यात दुरावा निर्माण करून एकमेकांना दूषणे देत बसण्यात काय अर्थ आहे हो ? काय कामाचा असा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा?तरीही अजुन वेळ गेलेली नाहीये आपण स्वःताला सांभाळूया, टीव्हीवर उगाचच सासु -सुन अश्या भिकार मालिका बघुन त्यावर विचार करण्यात वेळ वाया न घालवता वास्तविक समाजाने दुषीत केलेले सासू सुनेचे नाते आजच्या सुज्ञ सासू सुनांनी पुन्हा नव्याने प्रज्वलीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजेल..
"हुंडा पद्धती ".
मानव जातीला लागलेल्या अनेक कलंका पेकी हृदयास पिळ पडणार कलंक म्हणजे "हुंडा पद्धती " णतिओनल Crime Records Bureau च्या देशातील गुन्हेगारी वर्ष २०१० च्या आकडेवारी नुसार या वर्षात हुंडाबळीच्या एकूण ८३९१ घटना होत्या , म्हणजे दर "दीड तासाला एक हुंडा बळी , २००७ मध्ये हि संध्या ८०९३ एवढी होती, असो तर सांगण्याचा उद्देश हा कि "हुंडा बळी " यामध्ये "स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे " या व्याक्याची प्रचीती आल्या वाचून राहत नाही, केवळ स्त्री जन्म घेतलाय म्हणून हुंड्याच स्वरुपात यानला दंड दयाचाय का ? ? मुळात .कन्यादान करणे ही प्रथाच वाईट आहे .एखादा बाप आपली मुलगी दान करतो म्हणजे ती एखादी भेटवस्तू असल्याप्रमाणे दान करणे म्हणजे स्त्रीच्या मनुष्यत्वाचा अपमान करण्यासारखे नाही का ?? तसेच लग्नकार्यात हुंडा घेऊन पती अप्रत्यक्षपणे आपली बायको सांभाळण्यासाठी दुसऱ्या (सासऱ्या) कडून पैसे घेतो . म्हणजेच ते स्वत:ची पत्नी देखील स्वहिमतीवर सांभाळू शकत नाही असा याचा अर्थ होतो. मग अश्या षंढ व्यक्तीला आपला पती मानायचे ? अश्या व्यक्तीशी लग्न कराचे का ? असे करायला आपण इतक्या हतबल ,लाचार, मूर्ख आहोत का ? याचा विचार आता तरी करायला नको का ?
स्त्री भ्रूणहत्या-
स्त्री-पुरुष समानता अंमलात आली पाहिजे असे म्हणणारेच घरांत मात्र मुलगाच पाहिजे, मुलगी नको असा आग्रह धरतात खरतर पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रारंभ प्रत्येक कुटुंबात आईपासून सुरू होतो. मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन, ही धारणा निर्माण केली जाते, त्यामुळे त्याचा पुरुषप्रधान कंड घट्ट होतो. तो पुरुषप्रधान संस्कृतीचा वाहक बनतो. आणि हे चक्र अव्याहत सुरू राहते. पण हा आग्रहच मोडून काढायला नको का ? किंबहुना त्यासाठी स्त्रियांनीच प्रयत्न तरी करायला नको का ? कारण सुनेला पण भारतीय संस्कृतीचे अनेक आदर्श, नैतिक मूल्ये यांचा चाललेला ऱ्हास तसेच वंषाला दिवा ’ मुलगा ‘ पाहिजे हा सासुरूपी स्त्रीचाच मुख्य अट्टाहास.कोठे तरी थांबव्याला नको का? कारण मुलगा हवा असा आग्रह धरणारी सासूही एक स्त्रीच असते हे विसरुन चालणार नाही.
समाजकारण आणि राजकारण-
' स्त्री-मुक्ती' च्या नावाखाली आजकाल बरीच महिला मंडळे जन्माला पण मुळात ' स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्री ची मुक्ती, पण कशाक शातून ?? गुलामगिरीतून ? अत्याचारापासून ? गरीबीतून? लाचारीतून ? दुबळेपणातून ? की पुरुषांच्या मक्तेदारीतून???..का तिनेच स्वत:च स्वत:ला बांधलेल्या बंधनातून ?हेच अजून अनेक श्त्रीयाना कळले नाही. असो तर आजकाल महिलाही भाषणे देऊ लागलीत पण या महिलांचे कार्य सावित्रीमाई इतके क्रांतिकारक नाही. आपला मेक-अप बिघडणार नाही अश्या पद्धतीने त्यांचे सोशलवर्क चालू आता महिलानला बाबासाहीबानी देशाला अर्पण केलेल्या संविधानाच्या कृपेने ५०% आरक्षण मिळाले आहे, पण याचा खरच फायदा त्या करून घेतील का ? कि जस १९ व्या शतकात चुलीवर काय शिजवायच हा घरातील करता पुरुष ठरवत असे अगदी तशीच स्थिथी महिलानला मिळालेल्या ५०% आरक्ष नाच्या बाबतीत होईल का ? खरच,त्या स्वतःच्या इच्छेने राजकारण करतील कि पतीच्या इच्छेने ? त्या स्त्रीयांवरील होणारा अन्याय ,अत्याचार यांच्या विरोधास तसेच महिलांच्या दैनंदिन समस्या सोडव्यासाठी यशस्वी होयील का ? महिला विकास पक्ष दबावाने नष्ट होणार का ?..पक्षाच्या दबावाला किती महिला बळी पडणार ? या आरक्षणाचा लाभ स्त्रियांना कितपत पचनी पाडून घेता येईल ? राजकीय पक्षातही नाड्या पुरुषांच्याच हाती असल्यामुळे स्त्रियांच्याकर्तृत्वाला खरच वाव मिळेल का?
स्त्री : रुढी परंपरा आणि त्यांची भूमिका-
आपली अवस्था “कळतंय पण वळत नाही’ आणि “हम महापुरूषोंको मानते है, पर उनकी कुछ नाही मानते’ अशी झाली आहे. नवरा आंधळा होता म्हणून आयुष्भर डोळ्यावर पट्टी बांधणारी गांधारी त्यांला नको होती तर पतीच्या अंधालेपानावर आपल्या डोळसपनाणे त्यालाही दुष्टी मिळवून देणारी नवी गांधारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानला अभिप्रेत होती ..स्त्रियांनी ज्ञान संपादन करून एक नवा आदर्श हि निर्माण केला, पण आपल्यातील कांहीची अवस्था मात्र वेगळी आहे, आजही काही महिला बऱ्याच अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा यामध्ये गुरफटत चालल्या आहेत ...आणि हे सर्व आपल्या सद्‌सद्‌विवेक बुध्दीला पटते का ? अहो ज्या रूढी, प्रथा व परंपरा यामुळे आपला घात झाला आपलाला माणूस असूनही माणसाप्रमाणे वागणूक मिळत नव्हती मग का ती व्यवस्था पुन्हा रूजविण्यासाठी आपण प्रयत्न का करीत आहोत?? का करतोय हे आपण अनुकरण ? ?याचा विचार आज व्हायलाच हवा आपण हे सर्व फेकून द्यायला हवे. आजही लग्न जुळवताना पत्रिका पाहण्याचा मुर्खपणा आपल्या समाज्यातील स्त्रिया करताना दिसतात. एकवीसाव्या शतकात माणूस चंद्रावर पोहोचला, तरीही आपण शनी, राहू, केतू या पत्रिकेतील ग्रहांवर अवलंबून राहणार आहोत का ? आजच्या युगात मुलामुलींचा रक्तगट तपासणे गरजेचे असताना आपण त्यांची नाडी बघण्यात व्यस्त आहोत. हीच खरी समाजाची शोकांतीका आहे. पण आपण काय करत आहोत कुणाचे विचार अंगीकारत आहोत याचा विचार आपण करायला नको का? ....बोलाचाच भात । जेवूनीया कोण । तृप्त झाले।। बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।। ...फक्त उपदेश करायचे पण स्वत: ते आचरणात आणताना मात्र टाळाटाळ करायची अशा उपटसुंभ लोकांची संख्याही आपलात कमी नाहीये ...ज्या विचारांमुळे आपला विकास होणार आहे ते विचार आपण स्विकारतच नाही. अन्‌ ज्याच्यामुळे आपली अधोगती अध:पतन होणार आहे ते आपण सहज स्विकारतो. असे का घडते ?... कशासाठी ? त्याच्या पासून आपल्याला फायदा की तोटा ? जर आज स्त्रीची हि दशा आहे तर मग दिशा काय असेल ?......हा वर्तमान पण ही परिस्थिती कोठेतरी बदलाल्याला हवी आणि त्याची सुरूवात आत्ताच व्हायला हवी ना? म्हणून या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे आपण ( स्त्रियांनी ) बदल्यायाल हवे आपण बदललो ,तर परिस्थिती नक्कीच बदलेल आणि या बदलण्याला अर्थ प्राप्त होईल... त्यामुळे प्रत्येकीने स्वयं आत्मपरिक्षण करावे विचारांचे परिवर्तन होणार नाही तो पर्यंत समस्या सुटणार नाहीत. आणि त्याशिवाय खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री समाजाच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार नाही ...
लेख -प्रियांका नागेश कांबळे , पुणे

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...