नवरा मेल्यावर..??

अकाली नवरा मेल्यावर
काय करावं त्याच्या वस्तूंचं,
सामाना-सुमानाचं ?
ठेवणीतले कपडे, शर्ट-प्यँट वगैरे
गरिबाला देऊन टाकावं
किंवा घ्यावी भांडी बोवारणीकडून
तरी उरतोच प्रश्न त्याच्या अंडरविअरचा
मोबाईल येईल वापरता
सिमकार्ड बदलून
पण काँटॅक्ट लिस्टमधले
कलीग्जचे, मित्र-मैत्रिणींचे नंबर्रस्
करावे डिलीट की असू द्यावेत ?
गेल्या सात-आठ वर्षांत
डबलबेडवर एकाच बाजूला
लागलेली झोपायची सवय मोडता येईल
त्याची उशी नजरेआड करून ?
वर्षानुवर्ष त्याने लिहिलेल्या डाय-यांना
त्यात नोंदवलेल्या स्वप्नांना,
इच्छांना, आकांक्षांना
रद्दीत असा कितीसा मिळेल भाव ?
तो गेल्या दिवसाच्या आदल्याच रात्री
बंद पडलेलं रिस्ट वॉच
सांभाळावं उराशी
गरज नसलेल्या सहाव्या बोटासारखं ?
त्याच्या चपला द्याव्यात फेकून
की वाट पहावी
मुलाला त्या येतील याची ?
अर्धवट वाचून झालेल्या
कांदबरीच्या कुठल्याशा पानावरून
माझ्याकडे पाहणारा त्याचा चष्मा
ठेवावा मिटून
की सतत अनुभवावी जाणिव
तो पाहत असल्याची ?
हे मंगळसूत्र ठेवावं काढून
की ढाल म्हणून बाळगावं
परपुरूषांविरोधात
ओशटलेल्या नजरांपासून बचावाकरता ?
त्याच्याऐवजी मी जर गेले असते
तर हे शिल्लक राहिलेले काँडम्स
त्यांने दिले असते फेकून ?
कवी- गीतेश गजानन शिंदे
संपर्क - ९८२०२७२६४६

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...