देवाला सोडलेला 'मरीबा पोतराज' बनलाय लालासाहेब..

उस्मानाबाद : स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिलाय. पोतराजांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेनं पुढाकार घेतलाय. पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम संघटनेनं राबवलाय.
सामान्यांचं जगणं नाकारणारी पोतराज प्रथा... पुत्रप्राप्तीच्या नवसापोटी देवीच्या नावानं सोडलेला मुलगा म्हणजे पोतराज... कपाळावर हळद, कुंकवाचा मळवट, तोंडाला शेंदूर, कंबरेला विविध रंगांच्या कपड्याच्या चिंध्या... पायात विशिष्ट पद्धतीचा चाळ आणि डोक्यावर वाढलेले केस अशा अवतारात
पोतराज आपल्यासमोर येतो... स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा असा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिला असेल... पण आसुडाच्या फटक्यांमुळे होणाऱ्या जखमाही त्याला पोटभर अन्न देऊ शकत नाही. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव... देवीच्या कोपाच्या भितीमुळे त्यातून बाहेरही पडता येत नाही... म्हणूनच पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम मानवी हक्क अभियान संघटनेनं राबवलाय. पोतराज निर्मूलनाचे उद्देश, मातंग समजात पोतराज प्रथेच प्रमाण जास्त आहे. त्यानं हे अपमानित जगणं सोडावं म्हणून, या प्रथेतून बाहेर पडावे हाच या पोतराज निर्मुलन अभियानाचा उद्देश आहे, असं संघटनेचे कार्यकर्ते बजरंग ताटे
सांगतात.
उस्मानाबादमधल्या मरीबा लक्ष्मण डोंगरेलाही मानवी हक्क अभियान संघटनेनं नवीन आयुष्य दिलंय. खरं तर मरीबाला शाळेची खूप आवड... पण डोक्यावरचे लांबसडक केस पाहून वर्गातली मुलं त्याला चिडवायची... रस्त्यावर येता-जाता त्याला टोमणेही मारायची. त्यामुळे सहावीच्या वर्गातून मरीबानं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याची कुठलीही चूक नसताना केवळ आई- वडिलांनी देवीला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याला पोतराज म्हणून देवीला सोडलं होतं. 'शाळेमध्ये गेलो की मुले चिडवायची, दगड मारायची. केसं मुळ लाज वाटायची. मग, दोन वर्ष शाळा बुडाली' असं मरीबा डोंगरे सांगतो...
तर, माझ्या पत्नीला या मुलाच्या जन्माच्या वेळी खूप त्रास होत होता, त्यावेळी मी लक्ष्मी देवीला नवस बोलला होता कि जो मुलगा होईल तो देवीला पोतराज म्हणून सोडला जाईल. म्हणून आम्ही मुलाची केस वाढवली आणि पोतराज म्हणून सोडलं, आता केसामुळे त्याला मुले चिडवायची. त्याने दोन वर्षा पासून शाळा सोडली. त्याला तिथं इतर मुलं त्रास देत होती, असं मरीबाचे वडील लक्ष्मण डोंगरे सांगतात.
मानवी हक्क अभियान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मरीबाचं आणि त्याच्या पालकांचं प्रबोधन केलं... आणि त्याचे केस कापले. त्याचं मरीबा नाव बदलून लालासाहेब असं ठेवलं... आज त्याच्या आयुष्याला नवी ओळख मिळालीय. 'आता खूप चांगल वाटतेय, फ्रेश वाटतेय, २ वर्ष बुडालेली शाळा भरून काढणार, अधिकारी होणार' अशी स्वप्न रंगवण्यात लालासाहेब व्यस्त आहे. अशिक्षित, गरीब आणि मागासलेल्या समाजात, अंधश्रद्धा आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचं अस्तित्वच मिटवायचं असेल तर प्रबोधनानं मानसिकता
बदलण्याची मोठी गरज आहे.
Thank u.. झी २४ तास

गाव

कुटुंबाच्या आदमुसल्या दमाने
अन झरनाऱ्या घामाने
घरचा पोरगा शिक्षण घेतो,
आधी करतो
परिवर्तनाचा जयघोष
विषमतेविरुद्ध आक्रोश.
बाबासाहेबांच्या आधाराने
तो साहेब होतो
आणि गावाला कायमचा निरोप देतो.
आजन्म घामात भिजलेली
अन फाटक्या गोधडीत निजलेली
माय त्याची वाट पाहते.
मोडक्या कुडांना आधार देता देता
बाप मोडून पडतो,
तो मात्र बिझी असल्याचा निरोप धाडतो.
त्याची शिकलेली बायको
गावात येत नाही,
अन सोफीस्टीकेटेड नातवंड
आजीचे नावही घेत नाही.
सुख दु:खाच्या
एखाद्या अनिवार्य प्रसंगी
लाजी खातर तो गावात येतो
तुटलेल्या सवंगड्याच्या
फाटलेल्या जिंदगीवर
तो मारतो शेरा
अन उगाच मिरवतो
शहरात बांधलेल्या बंगल्याचा तोरा
तेंव्हा बाजूच्या बुढयाला
बोलण्याची उबळ येते
सात्विक संतापाने त्याचे ओठ हलते
जणू त्याच्या वाणीने सारेच गाव बोलते.
आगा, गावाच्या घराचे जरा हाल पाय
मजुरी करत जगते तुही थकलेली
माय..
जवान बहिण आणखी उजवाची हाये.
कर्जाचे सारेच उखीर बुजवायचे हाये.
तुह्यासाठीच सुटली तुह्या भावंडाची
शाळा..
आन पुतण्याच्या हाती आला
निन्द्ण्याचा इळा..
सोपं असतं गड्या देणं
समतेवरचं भाषण,
तुमच्या सारख्या आवलादीनच
हा मोहला झाला मसन.
आरे, परिस्थितीन आमी
कफल्लक असलो तरी
बाबासाहेबाच्या इचाराचे
सच्चे पाईक हाओत,
आन तुमचा आवाज मोठा करणरे
आमीच माईक हाओत...
कवी- हेमंतकुमार कांबळे
('गाव' या दीर्घ कवितेतून)
धन्यवाद- प्रशांतजी वंजारे सर

कसं वाटत असेल?

पायाला ठेच लागली, जीव किती तळमळतो
दगडांनी ठेचून मारतात... कसं वाटत असेल?
साधा चटका बसला, जीव किती चरफडतो
साले जिवंत जाळून मारतात... कसं वाटत असेल?
बोटाला सुई टोचली, माणूस किती कळ्वळतो
सुरे-तलवारी खसाखस भोसकतात... कसं वाटत असेल?
नकळत पदर ढळला, बाई किती शरमते
नग्न धिंड काढतात... कसं वाटत असेल?
किती अपमान, किती अवहेलना,
किती यातना, किती वेदना... कसं सोसत असेल?
किती काळ हे असंच चालायचं?
किती काळ सारं निमूट झेलायचं?
आता ठरवलंय... ठेवलेलं हत्यार खोलायचं
माणसातलं जनावर आरपार सोलायचंच
करायचीच माणसं आतून बाहेरुन शुद्ध
अन जागवायचा आता प्रत्येक माणसात
एक बुद्ध... एक बुद्ध... एक बुद्ध...
कवी-बबन सरवदे
काव्यसंग्रह-आता सुर्यच आमचा आहे

किमान खर्चांमध्ये कमाल संरक्षण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने गेल्या काही दिवसात अनेकविध योजना सादर केल्या आहेत. या योजनांमध्ये दोन विमाविषयक योजनांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील लोकांना या योजना आपल्याशा वाटत नसतीलही; मात्र अल्प उत्पन्न गटातील लोकांचे भविष्य साकारण्यासाठी या योजना वरदान ठरतील, यात शंकाच नाही.

अटल पेन्शन योजना

लाभ काय : प्रति महिना ₨ १,००० ते ५,००० पेन्शन

किती खर्च : चाळीस वर्षाच्या प्रौढ व्यक्तीला प्रति महिना १,००० रुपयांच्या पेन्शनसाठी वीस वर्षे दरमहा २९१ रुपये गुंतवावे लागतील. मात्र, अठरा वर्षाच्या व्यक्तीला चाळीस वर्षांसाठी दरमहा ४२ रुपये गुंतवावे लागतील. 

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानची व्यक्ती, वय वर्षे साठपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना प्रामुख्याने तुमच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ठरा​विक वर्षांनी काम सोडल्यानंतर अशा व्यक्तींकडे पाहणारे दुसरे कोणी नसते.


पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

लाभ काय : अपघाती विमा आणि दोन लाखांपर्यंत अपंगत्व विमा.

किती खर्च : वार्षिक १२ रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : ही योजना असणाऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते असणारी व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना सर्वांसाठी उपयुक्त आहे. विशेष करून ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, वृत्तपत्रविक्रेते, फळ-भाजीपाला विक्रेते. शिवाय ज्या व्यक्ती जिवावर उदार होऊन कामे करतात, त्यांच्यासाठी ही योजना अतिउपयुक्त.


पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

लाभ काय : पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसदाराला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण.

किती खर्च : वार्षिक ३३० रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ७० दरम्यानची कुणीही व्यक्ती; जिचे बँकेमध्ये बचत खाते आहे.

कोणासाठी उपयुक्त : तुमच्याकडे कार्यरत कुणीही नोकरदार.. ज्याच्या कुटुंबातील एकमेव कमविणारी व्यक्ती ती स्वतः आहे. तिच्यावर अथवा त्याच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.


पंतप्रधान जनधन योजना

लाभ काय : झीरो बॅलन्सचे बचत खाते मिळते, खातेधारकाला 'रुपे डेबिट कार्ड' मिळते, शिवाय एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा आणि तीस हजार रुपयांपर्यंतचा जीवनविमा.

किती खर्च : शून्य

अर्हता काय : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुणीही. भविष्यातील सर्व कल्याणकारी आणि अनुदानाशी संबंधित योजनांसाठी अत्यंत उपयुक्त योजना असल्याने तुमच्या नोकरदारांना अवश्य लाभ करून द्यावा.

कोणासाठी उपयुक्त : असंघटित क्षेत्रात कार्यरत प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त. तुम्ही तुमच्या नोकरदारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकता. त्यांना बँकेच्या व्यवहारांची माहिती देण्यासाठी उपयुक्त.


आरोग्यविमा योजना

लाभ काय : आजारी पडल्यामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे होणारे हॉस्पिटलायझेशनचे सर्व खर्च भरून निघतात.

किती खर्च : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानच्या व्यक्तीसाठी ५०,००० रुपयांपर्यंतच्या संरक्षणासाठी वार्षिक ७०० ते ८०० रुपयांचा प्रिमियम.

अर्हता काय : सर्वचजण पात्र.

कोणासाठी उपयुक्त : आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्यांना वैद्यकीय खर्च परवडत नाहीत. आयुष्यभराची पूंजी हॉस्पिटलवर खर्च करण्याची वेळ आलेल्यांसाठी योजना उपयुक्त.


सुकन्या समृद्धी योजना

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ९.२ टक्के दराने परतावा.

किती खर्च : किमान वार्षिक गुंतवणूक ₨ १,०००, कमाल वार्षिक गुंतवणूक ₨ १,५०,०००

अर्हता काय : दहा वर्षांखालील मुली

कोणासाठी उपयुक्त : घरकाम करणाऱ्या बहुतांश घरकामगार मुलींना शिकवण्याऐवजी संसाराला हातभार म्हणून कामाला जुंपतात. मुलीच्या नावे पैसे गुंतवल्यास तिचे शिक्षण आणि लग्न यासाठी काही रक्कम टप्प्याटप्याने दिली जाते.


किसान विकास पत्र

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.७ टक्के दराने व्याज आणि शंभर महिन्यांमध्ये ठेव रक्कम दापदुप्पट मिळण्याची खात्री.

किती खर्च : किमान एक हजार रुपयांची ठेव ठेवावी लागते. कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : कुणीही.

कोणासाठी उपयुक्त : सर्व वयोगटातील घरकामगार, वृत्तपत्रविक्रेते, मध्यम उत्पन्न गटातील कुणीही, अल्पकालीन गुंतवणुकीची इच्छा असणाऱ्यांसाठी.


टपाल खाते, बँकांच्या मुदत ठेवी

लाभ काय : एक ते चार वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर वार्षिक ८.४ टक्के दराने व्याज, पाच वर्षांच्या मुदतठेवींवर साडेआठ टक्के दराने व्याज, वयोवृद्ध घरकामगाराच्या अथवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावे पैसे गुंतवल्यास वार्षिक ९ ते ९.२५ टक्के दराने व्याज मिळण्याची हमी.

किती खर्च : टपाल खात्यामध्ये गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा ₨ २००, ​कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : आधार कार्ड किंवा बँक खाते असणारी कुणीही व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : घरकामगारांच्या अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त योजना. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी घरांचे डाउन पेमेंट करण्यासाठी, कोचिंग क्लासेसची फी भरण्यासाठी उपयुक्त रक्कम जमविण्यासाठी.


सर्वच योजनांचा एकत्रित वार्षिक हप्ता... (तुमच्याकडे कार्यरत घरकामगार महिला अथवा पुरुषाचे वय ४० वर्षे असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. ती व्यक्ती मासिक १,००० रुपयांच्या पेन्शन योजनेत सहभागी झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे.)

पंतप्रधान जनधन योजना ० + पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ₨ ३३० + पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ₨ १२ + अटल पेन्शन योजना ₨ ३,४९२ + आरोग्य विमा ₨ ८०० + सुकन्या समृद्धी योजना ₨ १,००० + किसान विकास पत्र ₨ १,००० + टपाल खाते, बँक ठेवी ₨ २०० = ₨ ६,८३४.

भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण शिवराज्याभिषेक !!

मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या २५०० वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. या शिवराज्याभिषेकानंतरच 'स्वराज्यास' एक ता‌त्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ 'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. भविष्यात पाकिस्तानातील 'अटक' शहराच्या पुढेही मराठ्यांचा वारू चौखुर उधळला याची यशस्वीपणे पायाभरणी करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या.
मध्ययुगाच्या आरंभापासून संपूर्ण भारतवर्ष परकीय इस्लामी, जुलमी शासकांच्या प्रचंड अत्याचाराखाली भरडला जात होता. दक्षिण भारतात अल्लाउद्दीन शिलजीच्या स्वारीनंतर पुढील ३०० वर्षात महाराष्ट्राला मोगल, आदिलशहा, निजाम शहा, सिद्ध‌ी या परकियांनी गुलाम केले. इ.स. १३१७च्या दिल्ली सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना, दु:ख आणि संकटांचा भीषण काळोख पसरला होता. या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली. आणि सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद, बेलाग दुर्गाच्या आश्रयाने, गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र ढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्ररणेने जिवंत बनवली. त्यावेळच्या तरूणांना त्यांनी एकत्र केले. त्यांच्यासोबत जसे तरूण होते तसे वर्षानुवर्षे परकीयांच्या सेवेत असलेले नामवंत सरदारही होते. मात्र या सर्वांसमोर त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी आपलेसे केले, वचक बसवला, प्रसंगी शिक्षा दिल्या आणि प्रेमही दिले. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंचे अडथळे शिवाजी महाराजांनी केले होते. त्यांचे शत्रुही त्यांच्यापेक्षा कित्येक पट बलशाही होते. त्यात केवळ हिदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे विशाल आकारमानाचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या प्रत्येक शत्रुचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करुन त्याच्या बलस्थानाबरोबरच दुर्बल स्थानांचाही विचार करुन आपल्या उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली सर्व शत्रुंना नामोहरम करुन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे सखेसोबती, हजारो मावळ्याच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झालीच व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडवरती प्राचीन 'राज्याभिषेका'च्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व बलाढ्य शत्रुंनाही वचक बसविण्यासाठी त्यांनी ६ जून १९७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. पूर्वीची मुसलमानी पद्धतीची लेखनपद्धती बदलून हिंदु पद्धतीची लेखनपद्धती विकसित करून लेखनप्रशस्ती, राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले. परकियाच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीही मराठी नावे दिली व आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारत-जगभरात पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधिशाविरुद्ध आक्रमणे, मोहिमांचा धडाका आरंभ केला.
हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे. या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन, विविध उपक्रमाने साजरा केला जातो. इतक्या वर्षानंतरही तरूण पिढीला हा राजा आपला वाटतो. आता ‌गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची. शिवरायांनी केवळ मैदानावरच्या लढाया खेळल्या नाहीत तर आपल्या लेखणीने आणि वाणीने अनेक लढाया जिंकल्या हे समजून देण्याची वेळ आली आहे.
By... प्रा. धीरज शिंदे

महिला आणि अंधश्रद्दा?

महिलांना त्यांच्या शरीरावरील कान नाक गळा पाय हातातील आभूषणे हे अंद्धश्रद्धे च्या गुलामगिरीच्या बेड़या वाटत नाही यामागे नक्कीच हजारो वर्षापुर्वी चा मानसिक पगडा असावा त्याच प्रमाणे पूर्वी स्वातंत्र्य लढाईत तरुण लोक आनंदाने फासावर जात कारण त्याना तो फास हा फास न वाटता स्वातंत्र्य देवी ने आपल्या साठी जनु फुलाचा हार विनला आहे असे वाटे आणि तो फास ते गळ्यात आनंदाने घालत.
याचप्रमाणे महिला ना अंधश्रद्देबेडया या बेड्या न वाटता ते अभुषणच आहे आणि त्या अंगावर मिरवतात त्या वेळी महिलांच्या अंधश्रद्धेच्या क्षेत्रातील लढाई बिकट बनते गुलामाला गुलामगिरी ची जाणीव करुण दिल्या शिवाय तो पेटुन् उठनार नाय. पण आपण गुलाम नाही अशीच त्यांची धारणा असते तेव्हा तर ती लढ़ाई अवघड होते पण या लढाई विरुध्द सातत्याने लढावे लागणार च नविन पद्धतीने अनेक वर्ष. शेवटी सत्याचा विजय होतो सत्य हे आपल्या बाजुला आहे म्हणून आपलाच विजय होणार.
By.. विवेकभाई पूनावाला

वटसावित्री !!!

वडाचे झाड तसे पुजनीयच आहे म्हणा ,त्याची पूजा केलीच पाहिजे, कारण ते २४ तास प्राणवायू ऑक्सिजन देते. परंतु सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून सुशिक्षित स्त्रिया जेव्हा त्याला दोरा गुंडाळून पूजा करतात तेव्हा मात्र त्यांच्या भाबडेपणाची व साक्षरतेची कीव करावीशी वाटते !
सत्यवान आणि सावित्री उन्हातून रस्त्याने जात असतांना प्रखर उन्हामुळे त्याला मूर्च्छा आली आणि तो बेशुद्ध होवून खाली कोसळला, सावित्रीने त्याला ओढत-ओढत बाजूच्या वडाच्या झाडाच्या सावलीत आणले. सावलीमुळे त्या सत्यवानाच्या शरीराचे तापमान सामान्य होऊन व त्याला मुबलक प्रमाणत प्राणवायू ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि सावित्रीने यमाला याचना करून आपला पती परत मिळविला म्हणून आजही अगदी सुशिक्षित स्त्रिया सुद्धा सात जन्मी हाच पती मिळावा ह्याच हेतूने वटसावित्रीला वडाच्या झाडाचे पूजन करतात.
मग त्या सावित्रीचे काय ?
जिने तुम्हाला शिकवून साक्षर करण्यासाठी शेण,माती, चिखल, दगड, शिव्या यांचा मार सहन केला? तो याच तुमच्या भोळ्या भाबड्या अंधश्रद्धा जोपासण्यासाठी का ? त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत बसण्यापेक्षा प्रत्येकीने दरवर्षी एक नवीन वडाचे झाड जर लावण्याचा कार्यक्रम केला असता तर किती बरे झाले असते नाही का?
सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून, मग तो कसाही असो व्यभिचारी असो, की दारुडा असो, रोज दारू पिवून तुम्हाला मरेस्तोवर मारणारा असो तुमच्या आईवडीलासह शिव्या देणारा असो, माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावणारा असो हुंड्यासाठी तुम्हाला छळणारा असो जाळणारा असो कसा ही असो पण सात जन्मी हाच पती लाभो म्हणजेच त्याचे अन्याय अत्त्याचार सोसण्यास एक जन्म अपुरा आहे म्हणून सात जन्मी हाच पती मिळावा का? आणि वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा करून कधी सात जन्मी तोच पती मिळतो का? कुणाला आजवर
मिळाला आहे का? कुणाला आपला पुनर्जन्म आठवतो का?

चंदनभाऊ बुटे

अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात.

अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,
'कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'

'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात. झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो. शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'

त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते. पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!

बारमाही काम करता येईल असा हा देश.
बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती.
बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो.

वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.
ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...