देवीचा कोप टाळण्यासाठी सपनाचा नरबळी !!

देवीचा कोप टाळण्यासाठी सपनाचा नरबळी !!


 
गावात देवीचा कोप आहे. तो टाळायचा असेल तर सपनाचा बळी हवा, असे एका महिलेच्या (अंगात देवी आल्याचे सोंग घेतलेल्या) सांगण्यावरून या बालिकेचा सुरीने गळा कापून बळी दिल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथे उघडकीस आली. गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपना पळसकर प्रकरणाचे अखेर रहस्य उलगडले. आजोबा-मामासह आठ जणांनी सपनाचे रक्त नुसते देवीला अर्पणच केले नाही तर क्रौर्याची परिसीमा गाठत ते प्राशनही केले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रपरिषदेत दिली.

 
कवटीवरून नरबळी प्रकरणाचा पर्दाफाश-

 
कवटी डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आली. त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला असता सपना पळसकर हिच्या नरबळीच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी यशोदाबाई पांडुरंग मेश्राम (५७), दुर्गाबाई सीताराम शिरभाते (३५), मोतीराम मेश्राम (५0), मनोज ऊर्फ लाल्या वसंता आत्राम (२२), देवीदास पुंजाजी आत्राम (२४), पुंजाजी आत्राम (६0), शेळकीबुवा (६५), यादव टेकाम (५५) सर्व रा. चोरंबा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी सपनाचे आजोबा पुनाजी, मामा देवीदास आणि अंगात देवी येणारी दुर्गाबाई यांनी कबुली दिली. अंधश्रद्धेतून माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो, याची प्रचिती या घटनेवरून येते. माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना गोपाळ पळसकर (१0) ही बालिका २४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. तक्रार देऊनही पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले.

 
सपनाच्या शोधासाठी विविध संघटनांनी आंदोलन केले. विधिमंडळातही हे प्रकरण गाजले. मात्र सपनाचा थांगपत्ता लागत नव्हता. अशातच २0 मे रोजी एका झुडुपात हाडे, कवटी आणि कपडे आढळून आले. कपडे सपनाचेच असल्याचे आईने सांगितले.


 
असे उलगडले रहस्य-


सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपनाचा शोध पोलिसांना लागत नव्हता. राजकीय आणि सामाजिक संघटनांचा दबाव वाढत होता. अशातच काही मंडळी पोलीस महानिरीक्षकांना भेटले. पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना घटनेचा छडा लावण्यासाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला. त्यावरून पोलीस निरीक्षक सारंग नवलकर याचे पथक नियुक्त करण्यात आले. सपना बेपत्ता झाली त्यादिवशी तिला बिस्कीटसाठी दिलेले दहा रुपये आणि त्याचवेळी खंडित झालेला वीज पुरवठा पोलिसांच्या तपासाला दिशा देऊन गेला.


 
असा दिला नरबळी-

 
चोरंबा येथे पहिल्यांदाच नवरात्रात देवीची स्थापना करण्यात आली होती. दुर्गाबाई शिरभाते हिच्या अंगात देवी आल्यावर तिने देवीचा कोप झाला असून हा कोप दूर करण्यासाठी नरबळी हवा असल्याचे सांगितले.अंधश्रद्धेने आंधळे झालेल्या उर्वरित सात जणांनी नरबळीचा कट आखला. यासाठी १७ ऑक्टोबरला सात जणांची बैठक झाली. प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले. मांत्रिक आणि खासगी लाईनमनचे काम करणार्‍या मोतीरामने घटनेच्या दिवशी गावातील वीज पुरवठा खंडित केला. याच संधीचा फायदा घेत यादव टेकामने सपनाला शाळेजवळून उचलले. शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन तोंड व हातपाय बांधून तिला यशोदा मेश्रामच्या घरी आणले. सपनाला घरी आणताच मांत्रिक मोतीराम मेश्रामने अंधारात मंत्रोच्चार करीत सपनाच्या गळ्यावरून सुरी फिरविली. क्षणात सपनाचा बळी घेतला. सपनाचे रक्त एका प्लेटमध्ये घेऊन गावातील चौकात स्थापन केलेल्या देवीला अर्पण केले.एवढेच नव्हे तर ते या आठ जणांनी प्राशन केले.


 
सपनाला पुरलेल्या दोनही ठिकाणांहून हाडे जप्त-


 
नरबळी प्रकरण... आठही मारेकर्‍यांना पोलीस कोठडी -

 
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सपना पळसकर या बालिकेच्या नरबळीप्रकरणात अटक केलेल्या आठही आरोपींना आज येथील न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, या आरोपींकडून घटनेचे प्रात्यक्षिक करून घेवून मारेकर्‍यांनी मृतदेह पुरलेली दोनही ठिकाणे खणून काढली. त्यामध्ये सपनाच्या हाडांचे अवशेष आढळून आले. ते जप्त केले आहे. सात महिन्यांपासून बेपत्ता सपना पळसकर प्रकरणाचे गूढ दोन दिवसांपूर्वी उलगडले. त्यामध्ये रक्ताच्याच नात्यातील माणसांनी देवाचा कोप टाळण्यासाठी तिचा नरबळी दिल्याचे निष्पन्न झाले.

 
नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणार्‍या या क्रूर घटनेप्रकरणी चोरंबा येथीलच आठ जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये मुख्य आरोपी यशोदाबाई पांडुरंग मेश्राम, दुर्गाबाई सीताराम शिरभाते, मोतीराम मेश्राम, मनोज ऊर्फ लाल्या, वसंता आत्राम, देवीदास पुंजाजी आत्राम, पुंजाजी आत्राम, शेळकीबुवा, यादव टेकाम सर्व रा.चोरंबा यांचा समावेश आहे. त्यांना आज प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी येथील न्यायालयापुढे हजर केले. यावेळी आठही आरोपींना न्यायालयाने १ जूनपर्यंत म्हणजेच सात दिवसांची कोठडी सुनावली. या सर्व आरोपींना ताब्यात घेवून आज विशेष पथकाने चोरंबा येथे त्यांच्याकडून घटनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले. त्यानंतर यशोदाबाईच्या घराच्या आवारात आणि तिच्या घरापासून ५00 मीटर अंतरावर असलेल्या नाल्यामध्ये सपनाचा मृतदेह पुरलेली ठिकाणे खणून काढण्यात आली. या दोनही ठिकाणी हाडांचे अनेक अवशेष आढळून आले. हे सर्व अवशेष पोलिसांनी जप्त केले.


 
सपनाच्या गळ्यावर फिरवण्यासाठी वापरलेली सुरी आणि तिचे रक्त प्राशनासाठी उपयोगात आणलेली प्लेट लवकरच मारेकर्‍यांकडून जप्त करण्यात येणार आहे. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांनी चोरंबा येथे भेट दिली. तसेच आरोपींची उलट तपासणी घेतली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत महानिरिक्षक बिहारी यांनी सहायक पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या नेतृत्वातील पथकाला २५ हजारांचे रोख पारितोषिक जाहीर केले. त्याची रक्कमही पथकाला देण्यात आली. दरम्यान, या संदर्भात पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सपनाच्या नरबळी घटनेत आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे सांगितले. तसेच त्यांची नावे पुढे आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. मारेकर्‍यांचा आकडा हा दहाच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

 


यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील चोरंबा हे गाव समाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे यांच्या मतदार संघात येते. "जादूटोणा विरोधी कायदा" समाजिक न्याय विभागाकडे येतो. सपना... आम्हांला शरम वाटते, तु आम्हांला माफ कर... हां  "जादूटोणा विरोधी कायदा" आम्ही वेळीच पास केलां असतां तर तुझे प्राण वाचण्याची शक्यता होती. सपना तुझा अमानुष बळी हा शासनाच्या अंध्रश्रद्धा निर्मुलनासाठी लढण्याच्या राजकीय समाजिक इच्छाशक्तीच्या अभावाचा व नाकर्तेपणाचा परिणाम आहे.
 

संदर्भ- 



http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-1-25-05-2013-c84ee&ndate=2013-05-26&editionname=nagpur

 
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/-/articleshow/20276846.cms?

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...